महाराष्ट्र
80027
10
स्वतःच्या विचाराने क्रांती घडवणारे शिक्षक असतात-नितेश कराळे मास्तर
By Admin
स्वतःच्या विचाराने क्रांती घडवणारे शिक्षक असतात-नितेश कराळे मास्तर
शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील शिक्षकांचा गुणगौरव समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी:
स्वतःच्या विचाराने क्रांती घडविणारे शिक्षक असतात. विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून उदयास आणण्याची जबाबदारी शिक्षकांची असून अनुभवाचे शिक्षण पैशात मोजता येत नाही. अन्याय व अत्याचार विरोधात शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे मास्तर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील शिक्षकांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कराळे मास्तर बोलत होते.अध्यक्षस्थानी ह. भ. प. दादा महाराज नगरकर होते.
याप्रसंगी केदारेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माधवराव काटे, पाथर्डीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगावचे तालुका अध्यक्ष हरीश भारदे, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, महिला तालुकाध्यक्ष सविता भापकर, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, माजी जी. प. सदस्य गहिनीनाथ शिरसाट,युवकचे तालुकाध्यक्ष महारुद्र कीर्तने, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, हुमायून आतार, दिगंबर गाडे, शहराध्यक्ष योगेश रासने, देवा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कराळे मास्तर पुढे म्हणाले, आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी प्रत्येकाला संघर्षातून जावेच लागते. संघर्षात पाय रोवून उभा टाकणारा जीवनात यशस्वी होतो, मात्र अशा गोष्टींचा अहंकार कधी बाळगू नका. एक चांगला मित्र हजार पुस्तकांच्या बरोबरीचा असतो. तुमची टिंगल होत असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात, कारण यशस्वी माणसाचीच निंदा होते. देशात सध्या अतिशय विचित्र पद्धतीने प्रशासनाला चालवली जात आहे, त्यामुळे प्रत्येकाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर विश्वास ठेवायला हवा, कारण संविधानच अशी गोष्ट आहे जी सामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देऊ शकते.
केंद्र सरकारवर टीका करतांना कराळे मास्तर म्हणाले, देशात सध्या सर्वोच्च बेरोजगारीचा आकडा निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने अग्नी विहीर योजना आणली जी अतिशय फसवी आहे. १९ व्या वर्षी नोकरी देतात आणि तेविसाव्या वर्षी निवृत्ती देतात, अशी योजना आणणारा जगाच्या पाठीवर भारताचा एकमेव पंतप्रधान आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना जबाबदारीचे भान शिकवा, आमिष भूलथापा यांना बळी पडू नका, चांगल्या वाईट गोष्टी त्यांना समजावून सांगा. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून उज्वल भवितव्याचे स्वप्न पहा आणि तरुण-तरुणींनी आपल्या जीवनात स्वतःच्या आई-वडिलांचा आदर्श बाळगावा, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
प्रतापराव ढाकणे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटतो, तरीपण सरकार त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही, किंबहुना त्यावर एक भाष्य सुद्धा करत नाही. आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पाहायला कोणी तयार नाही. लहान मुलांना अक्षरशः मंदिरात बसून शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात. एकीकडे विकसित भारताचे स्वप्न दाखवत असतांना दुसरीकडे मात्र अशी विदारक परिस्थिती आहे. शाळांकडे जायला रस्ता नाही त्यामुळे शिक्षकांसारख्या सजग नागरिकांनी या संदर्भातील जागृती करणे आवश्यक असून प्रशासनाचे लक्ष वेधले पाहिजे.
प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजी मरकड यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा शेळगावकर यांनी केले तर आभार गणेश सरोदे यांनी मानले.
Tags :

