महाराष्ट्र
307
10
डिसेंबर-जानेवारीत कांद्याचे भाव वाढणार! परतीच्या पावसाने अडीच लाख हेक्टर लागवड घटली
By Admin
डिसेंबर-जानेवारीत कांद्याचे भाव वाढणार! परतीच्या पावसाने अडीच लाख हेक्टर लागवड घटली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यात दरवर्षी खरीप व लेट खरीप हंगामात चार-साडेचार लाख हेक्टरवर कांदा लागवड होते. पण, यंदा अतिवृष्टीमुळे लागवडीखालील क्षेत्रात तब्बल अडीच लाख हेक्टरची घट झाली आहे. रब्बीतील कांदा लागवडीची आता तयारी सुरु आहे.
त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात कांद्याचे भाव पाच हजारांवर जातील, असा अंदाज फलोत्पादन विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील एकूण कांदा उत्पादनातील ७० टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. त्यानंतर नगर, पुणे, सोलापूर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. परंतु, जुलै ते ऑक्टोबर या काळात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कांद्याची रोपे वाया गेली आणि जमिनीतील ओलावा लवकर कमी झाला नाही. त्यामुळे खरीप व लेट खरीपातील कांदा लागवडीत मोठी घट झाली. मागील वर्षी खरीप व लेट खरीपात तीन लाख ५९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. पण, यंदा केवळ एक लाख १९ हजार हेक्टरवरच कांद्याची लागवड झाली आहे. आता १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणाऱ्या रब्बी हंगामात कांदा लागवड वाढेल, असा अंदाज फलोत्पादन विभागाने व्यक्त केला आहे. मागच्या वर्षीचा जवळपास दोन-अडीच लाख टनापर्यंत कांदा शिल्लक असेल आणि बराच कांदा पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने कांद्याचे भाव वधारतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण, आता लागवड
केलेला कांदा फेब्रुवारीत येईल. सध्या कांद्याचे दर प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजारांपर्यंत आहेत.
कांदा लागवडीची सद्यस्थिती
खरीपातील लागवड
९०,००० हेक्टर
लेट खरीपातील लागवड
२९,००० हेक्टर
रब्बीतील अंदाज
४.५० लाख हेक्टर
सध्याचे प्रतिक्विंटल दर
२३०० ते २६००
'साठेबाजी'वर वेळेतच नियंत्रण
कांदा लागवडीखालील क्षेत्र, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान आणि सध्याचा शिल्लक कांदा, या बाबींचा अंदाज घेऊन सध्याचा उपलब्ध कांदा काहीजण साठा करून ठेवतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत कांद्याचे दर भरमसाठ वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर साठेबाजीवर लक्ष ठेवले जाईल असे फलोत्पादन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात कांद्याचे दर वाढणार असल्याची माहिती ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळाली होती. सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या कंदाच्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. डिसेंबरमध्ये कांद्याची आवक होणार आहे. यामुळेच कांद्याची वाढणारी मागणी पाहता कांदा महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला याचा फटका बसणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकामधील हळवी कांद्याचेसुद्धा नुकसान झाले. याआधी पावसामुळे कांद्याचे नुकसान होत होते. पण यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने कांद्याच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बाजारात येणारा कांदा खराब झाला. दरम्यान नवीन हळवी कांद्याची लागवड सध्या सुरू आहे. हा कांदा बाजारात यायला नवे वर्ष उजाडणार आहे.
Tags :

