धावत्या कारने घेतला पेट : तरुणांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टाळला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील गोकूळ नगरी, १३ बंगले रस्त्यावर
असलेल्या स्कूलसमोर नुकताच एका बावत्या कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये एकाच कुटुंबातील पाचजण प्रवास करीत होते. तरुणांच्या मदतीमुळे कारमधील सर्वजण सुरक्षित आहेत.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की आई, वडील, दोन मुले व जावई असे पाचजण फोर्ड कारने नाशिकहून कोपरगावला निघाले होते. कोपरगाव येथील डॉ. आढाव हॉस्पिटलमध्ये असलेल्या आपल्या सुनेला भेटण्यासाठी ते नाशिकवरून कोपरगावला येत होते. गोकूळ नगरी परिसरातील टाइनी टॉस स्कूलसमोर काल मंगळवारी (दि. ३) दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या धावत्या गाडीने अचानक पेट घेतला. पेट घेतलेल्या एमएच ०४ एफए ६९७६ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या फोर्ड कारमधून सलीम शेख, तसलीम
शेख, जागीर सलीम शेख, अमान एजाज शेख व फरीदा अमान शेख असे एकूण पाचजण प्रवास करीत होते. यावेळी बघ्याची भूमिका न घेता काही तरुणांनी प्रसंगावधान राखत गाडीतील सर्वांना खाली उतरवले आणि सुरक्षित अंतरावर नेऊन सोडले. त्यानंतर गाडीचे बोनेट उघडून पेटलेल्या मशीनवर पाणी मारत आग आटोक्यात आणली. गाडीची बॅटरी ओढून बाहेर फेकल्याने आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. शहरातील या तरुणांनी मोठे धाडस दाखवत कारला लागलेली आग आटोक्यात आणली. तरुणांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे पाचही जणांचा जीव बचावला. तरुणांनी केवळ आगच विझवली नाही, तर
घाबरलेल्या कुटुंबाला दिलासाही दिला. एका तरुणाने
घटना घडल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेच्या
अग्निशमन विभागाला कळवली. त्यानंतर अवघ्या
१० मिनिटांत नगरपालिकेची अग्निशमन गाडी या
ठिकाणी पोहोचली. चालक प्रशांत शिंदे, फायरमन
सागर काटे, धनंजय सिनगर यांनी प्रेशरने पाणी
मारून गाडीची आग नियंत्रणात आणली.