अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटीची आर्थिक मदत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ठाकरे सरकारने आता मदतीची घोषणा केली आहे. शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.