सरकारचा मोठा निर्णय ! राज्य सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनुकंपा धोरण लागू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील ‘अ’ व ‘ब’ गटातील अधिकाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यानुसार, या गटातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना देखील अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती दिली जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत शासकीय सेवेतील गट क किंवा गट ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच हा निर्णय लागू होता. या गटातील कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येत होती. मात्र, आता अनुकंपा धोरण सर्व अधिकाऱ्यांना लागू असणार आहे.
कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होणार आहेत.