श्री रत्न जैन विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
By Admin
श्री रत्न जैन विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
अकरा वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांना २०१३-१४ च्या काळात गेल्याची अनुभूती
एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींचा आनंद गगनात मावेना
पाथर्डी प्रतिनिधी:
माणिकदौंडी येथील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री रत्न जैन विद्यालयात २०१३-१४ मधील दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी पन्नास हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
आजच्या धावपळीच्या जीवनात आनंद कुठे शोधायचा, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. स्वार्थीपणाच्या दुनियेत दोस्ती हे एकमेव नाते निव्वळ आणि निर्मळ स्वच्छ पाण्यासारखे असते. तोच धागा विणण्याचा अनुभव श्री रत्न जैन विद्यालयाच्या २०१३-१४ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी यांच्या संकल्पनेने विद्यालयात स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. तब्बल ११ वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र आले होते.
सर्वप्रथम सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरुजनांचे ऋण व्यक्त करण्यासाठी सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे औक्षण करून फेटे बांधून सत्कार करण्यात आला. दीप प्रज्वलन, रांगोळी, स्वागत गीत अशा मंगलमय वातावरणात हा मेळावा पार पडला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांनी दिलेला अभ्यास, शिकवण, शिक्षा, स्नेह संमेलन आणि त्यातील विविध संस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयावर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजाराम माळी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्नेह मेळाव्यास उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेस शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमास विद्यालयाचे अनिल पटवा, सूर्यभान दहिफळे, राजेंद्र चव्हाण, नवनाथ बुचकुल, समाधान आराख, संजय राठोड, प्रशांत रक्ताटे, सुधाताई खामकर, करूणा कोकाटे, राजेंद्र बोरुडे, संतोष वाघ, उत्तम बोरा, मोहन दाते, शहादेव कसबे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभम तोडकर, अक्षय पाखरे, अनिकेत पाखरे, अतुल गर्जे, तौसीफ बेग, प्रगती तोडकर, मच्छिंद्र राठोड, हनुमान जिवडे यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिनी चितळे, सूत्रसंचालन प्रितम झिंजुर्के व रोहिणी आठरे, अध्यक्ष निवड संतोष गर्जे, अनुमोदन सुनिल राठोड यांनी केले. आभार अश्विनी राठोड हिने मानले.

