पोलीस पाटील भरतीसाठी सोमवारी लेखी परीक्षा, नगर जिल्ह्यात 822 पदे रिक्त
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गेल्या 10-12 वर्षांपासून रखडलेल्या पोलीस पाटील भरतीला शासनाने हिरवा कंदील दिला. मात्र, महसूल विभागाच्या कार्यबाहुलेपणामुळे भरतीप्रक्रियेस विलंब होत होता. सध्या नगर जिह्यात पोलीस पाटलांची 822 पदे रिक्त आहेत.
ही पदे भरण्यास अखेर जिल्हा प्रशासनाला मुहूर्त मिळाला असून, भरती कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार सोमवारी (15 रोजी) पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे.
नगर जिह्यातील 1443 गावांसाठी पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत. निधन, वय व इतर कारणांमुळे पोलीस पाटलांची पदे रिक्त होत आहेत. मात्र, भरतीप्रक्रिया वेळेत राबवली गेली नसल्याने रिक्त पदांची संख्या वाढू लागली आहे. 2013 मध्ये जिह्यात भरतीप्रक्रिया राबवली होती. त्यावेळी फक्त श्रीरामपूर व संगमनेर विभागात भरतीप्रक्रिया पूर्ण झाली होती, त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून रिक्त जागांची संख्या 822 झाली आहे.
नगर जिह्यात सध्या पोलीस पाटलांची 57 टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलीस प्रशासनाला अडचणी येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त पदे भरण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने बिंदुनामावलीसाठी धावपळ सुरू होती. बिंदुनामावलीस मंजुरी मिळाल्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकाऱयांनी गावनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली गेली. त्यानंतर आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर पोलीस पाटील भरतीप्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम प्रसिद्ध केला. त्यानुसार सोमवारी (15 रोजी) लेखी परीक्षा होणार आहे
तालुकानिहाय रिक्त जागांची संख्या
अकोले 71, संगमनेर 66, कोपरगाव 31, राहाता 19, श्रीरामपूर 19, राहुरी 45, नेवासा 38, नगर 83, पाथर्डी 109, शेवगाव 82, कर्जत 69, जामखेड 45, पारनेर 108, श्रीगोंदा 37.