सरकारी कर्मचा-यांच्या विमा कवच योजनेस 30 जूनपर्यत वाढ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 15 मे 2021 , शनिवार
कोरोनाविरोधातील युद्धात उतरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याच्या योजनेस 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या योजनेस पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात कोविड विरोधाच्या युद्धात सर्वस्तरावरील सरकारी कर्मचारी उतरले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मे महिन्यात सरकारने घेतला आहे. ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत लागू होती. पण राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे. ही योजना सर्व राज्यांतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासकीय सार्वजनिक उपक्रमांनाही लागू आहे. त्यात पोलीस, आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशासन कर्मचारी, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागरे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले व अन्य विभागांचे कर्मचारी इत्यादी तसेच कंत्राटी कामगार, आऊटसोर्स केलेले कामागार, रोजंदारी व स्वयंसेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.