महाराष्ट्र
90522
10
संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस;
By Admin
संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस; पण जगतापांना कारवाईचा इशारा नवीन नाही
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गेल्या काही काळापासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले आणि टीकाही होत असलेले अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आता अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. कारण पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत पक्षविरोधी भूमिका का घेतली?
याची कारणे दाखवा नोटीस पाठविणार असल्याचे आज जाहीर केले. त्यामुळे आता जगताप पक्षाच्या नोटीसला काय उत्तर देणार, त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, इतिहास पाहिला तर जगताप यांच्यासाठी हे नवीन नाही. 2018 मध्ये अहिल्यानगर (तत्कालीन अहमदनगर) महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत जगताप यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत भाजपला साथ दिली होती. त्यामुळे महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे तर उपमहापौरपदी भाजपच्या मालन ढोणे यांची निवड झाली होती. राज्यात भाजपशी युती असलेल्या शिवसेनेला तेव्हा सत्तेतून बाहेर राहावे लागले होते. जगताप यांच्या या भूमिकेवर तत्कालीन एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त करीत संबंधित नगरसेवकांना कारवाईच्या नोटिसा दिल्या होत्या. ज्येष्ठ नेत्यांनी संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. पुढे या 18 नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले खरे मात्र काही काळातच बडतर्फी मागे घेण्यात आली. जगताप यांच्यावर तर कोणतीच कारवाई झाली नव्हती. पुढे ते 2019 आणि 2024 असे दोनदा आमदार झाले.
2018 मध्ये नगरला काय झाले होते?
त्यावेळच्या अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती. राष्ट्रवादी 18 तर भाजप 14 जागा घेऊन तिसऱ्या क्रमांकवर होती. प्रत्यक्षात दोन्ही पदे तिसऱ्या क्रमांकावरील भाजपला मिळाली. भाजपला स्वत:चे 14 अधिक दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसेच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असे मिळून 37 जागांचे संख्याबळ भाजपच्या पदरात पडले. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. उपमहापौर भाजपच्या मालन ढोणे झाल्या. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे नेते, जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डिले यांनी हे समीकरण जुळवून आणले. तेव्हा दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवायचे हाच राजकीय उद्देश जगताप यांचा होता. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधात जाऊन ही भूमिका घेतली होती.
यावरून राज्यात मोठा गदारोळ उठला होता. पक्षाकडून जगताप यांना विचारणाही झाली. त्यांच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीसा आल्या होत्या. त्यावर जगताप यांची भूमिका होती की, आम्ही भाजपला शहराच्या विकासासाठी पाठिंबा दिला. या विषयी राज्यातील कोणत्याच नेत्यांशी चर्चा झाली नव्हती. तशी कोणाला माहिती देखील नव्हती, तर हा ऐन वेळी झालेला निर्णय आहे. निवडणुकीपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे हा निर्णय घेतला, असे त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले होते.
मात्र, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपसोबत गेलेल्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्याचे सांगितले होते. महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करुन लढवली होती. महापौर-उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठींबा देवू नये अथवा त्यांच्या बाजुने मतदान करु नये, असे स्पष्ट आदेश पक्षाच्यावतीने असतानाही भाजपाला मतदान करुन पक्षादेश डावलला असल्याने ही कारवाई करीत असल्याचे त्यावेळी मलिक म्हणाले होते. यावर सात दिवसांत खुलासा मागविण्यात आला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यावेळी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचे दुसरे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यासंबंधी जाहीर भाष्य केले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केलेले असताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर झाल्याची लाच वाटत असल्याचे आव्हाड म्हणाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. असे त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते.
पुढे भाजपला पाठिंबा देणाऱ्या 18 नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. काही काळातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरील ही कारवाई मागे घेण्यात आली. आमदार जगताप यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. पुढे त्या्ंना सलग दोनवेळा उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. विशेष म्हणजे अडीच वर्षांनी पुन्हा ही निवडणूक आली, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. तेव्हाही पुन्हा काय होणार, याकडे लक्ष लागलेले असताना जगताप यांनी आघाडी धर्म पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचा महापौर आणि राष्ट्रवादीचा उपमहापौर झाला. अर्थात भाजप या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याने बिनविरोध निवड झाली.
आता जगताप यांच्याविरूद्ध नोटीस पाठविण्याचे कारण वेगळे आहे. त्यांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका पक्षाला पटत नाही, असे दिसते. मात्र, पूर्वी जेव्हा कारवाई झाली, तेव्हा भाजप हा राष्ट्रवादीचा विरोधीपक्ष होता. यावेळी तर दोन्ही पक्ष एकत्र आणि सत्तेत आहेत. शिवाय जगताप यांचे भाजप आणि हिंदुत्ववादी नेत्यांसोबत असलेला संपर्क तेव्हापेक्षा आता अधिक आहे. तर दुसरीकडे सध्या ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, त्या पक्षाची राजकीय भूमिकाही बरीच बदललेली आहे. अशा परिस्थिती पक्षाने इशारा दिल्याप्रमाणे खरेच जगताप यांच्यावर कारवाई होणार काय? झाली तर त्याचा जगताप यांच्या राजकीय प्रवासावर काय परिणाम होईल? यावर सध्या चर्चा सुरू आहे.
Tags :
90522
10





