लोकसभा निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येणार
By Admin
लोकसभा निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येणार? भेंडवळचं मोठं भाकीत जाहीर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर होणार्या भेंडवळ भविष्यावर राज्यातील सामान्यांसोबतच शेतकर्यांचेही लक्ष असते. त्या पार्श्वभूमीवर भेंडवळ भविष्यवाणीची घोषणा करण्यात आली.
पीक पाण्याचा अंदाज काय?
भेंडवळ भविष्यवाणी नुसार 2024-25 जून महिन्यात पाऊस कमी पडेल. त्यानंतर जुलै महिन्यात साधारण पाऊस होणार आहे. ऑगस्टमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाची बरसात होईल. तर सप्टेंबर महिन्यात यंदा दमदार पाऊस असेल. असे भेंडवळच्या मध्यमातून समोर आले आहे. भेंडवळचे हे भाकीत असले तरी यंदा भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे अतिवृष्टी होऊन महापुराचा धोका आहे. पाऊस दमदार बरसण्याची शक्यता असल्याने यंदा जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल.
कोणतं पीक बहरणार?
ज्वारी, तूर, गहू, कापूस, सोयाबीन याची पीकं कमी जास्त येतील.काही ठिकाणी पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल. पण चारा टंचाई भासू शकते. यावर्षी मात्र नैसर्गिक आणि कृत्रीम आपत्तीची शक्यता नाही. असेही भेंडवळच्या माध्यमातून समोर आले आहे.
देशात कोणाची सत्ता येणार?
देशात राजाची सत्ता कायम राहिल असे भाकीत करण्यात आले आहे. आर्थिक संकट दुर होईल. संरक्षण खात्यावर ताण, घुसखोरीची शक्यता आहे, असे भेंडवळने आपल्या भविष्यवाणीत सांगितले आहे. अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी भेंडवळ येथे घट मांडणी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार यंदाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. राज्यभरातील बळीराजा या भेंडवळीचं भविष्य जाणून घेऊन आगामी पेरणी करतो.
काय आहे परंपरा?
दरवर्षी अक्षयतृतीयेच्या सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतामध्ये वाघ घराण्याचे वंशज घटाची मांडणी करतात. या घटामध्ये 18 धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा यांची विशिष्ट स्वरूपात मांडणी करतात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा खणून त्यामध्ये पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतिक असलेली 4 मातीची ढेकळे ठेवतात. त्यावर पाण्याने भरलेली घागर, घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोळी, कुरडई, तर खाली विड्याच्या पानावर सुपारी ठेऊन प्रतिकात्मक मांडणी करण्याची या गावातील प्रथा आहे. दुसर्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरुन भविष्य जाहीर केले जाते.

