शेतकऱ्यांना पाच लाखापर्यत कर्ज शून्य टक्के व्याज दराने मिळणार; जिल्हा बॕकेचा निर्णय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील शेतकर्यांना पाच लाख रूपयांपर्यंतचे अल्प मुदत पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके व व्हाईस चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा झाली. यात सध्या शेतकर्यांना शासनाचे व्याजदर परतावा धोरणानुसार तीन लाख रूपयांपर्यंतचे अल्प मुदत पिक कर्जाची परतफेड विहीत मुदतीस केल्यास तीन लाखांपर्यतच्या मर्यादेत अल्पमुदत पिक कर्ज शेतकर्यांना शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध आहे. मात्र, तीन लाखांच्या पुढील पिक कर्ज शेतकर्यांना बँकेच्या प्रचलित व्याजदर 10 टक्के व्याजदराने उपलब्ध होत होते. शेतकर्यांच्या हिताच्यादृष्टीने बँक नेहमीच चांगले निर्णय घेतलेले असून त्याअनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळ सभेत यावर चर्चा होऊन जिल्ह्यातील शेतकर्यांना तीन ते पाच लाखांपर्यतच्या कर्जाचे व्याज बँकेच्या स्व भांडवलातून देणेचा निर्णय घेतल्याने शेतकर्यांना आता पाच लाखांपर्यतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात विकास सोसायटीच्या माध्यमातून जवळपास 3 लाख शेतकरी कर्जदार सभासदांना 2 लाख 24 हजार हेक्टर क्षेत्रासाठी रक्कम 1 हजार 726 कोटी रुपयांचे कर्ज वाटप जिल्हा बँकेने केलेले आहे. जिल्ह्यात वेळेत कर्ज परतफेड करणार्या शेतकरी सभासदांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याची माहितीही बँकेचे चेअरमन शेळके व व्हाईस चेअरमन अॅड. कानवडे यांनी दिली.