महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार,नियमावली नुसार अंमलबजावणी आवश्यक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील सर्व महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. मात्र ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थितीने कॉलेज सुरू करायचे किंवा नाही याबाबतचा निर्णय स्थानिक प्राधिकरणाशी विचार विनिमय करून विद्यापीठांनी घ्यायचा आहे, असेही सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा राज्य सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत.
नियमावली
- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, सेल्फ फायनान्स विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये सुरू करण्यास शासनाची मान्यता, मात्र ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करूनच विद्यापीठ स्तरावर घ्यावा.
- कोविड-१९ लसीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थीच प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहू शकतील.
- ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी
- वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण संचालक, तंत्र शिक्षण संचालक यांनी आढावा घेऊन कार्यवाही करावी
- ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी संबंधित विद्यापीठ, महाविद्यालयांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणाची विशेष मोहिम राबवावी आणि लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे.
- विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.