महाराष्ट्र
13735
10
अनुभवातून आलेली कविता ही सकस कविता असते- कवी प्रकाश घोडके
By Admin
अनुभवातून आलेली कविता ही सकस कविता असते- कवी प्रकाश घोडके
शीला जावळे यांच्या जिव्हाळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
शेवगाव- प्रतिनिधी
माणसाच्या मनातील भाव संवेदना कमीत कमी शब्दात व्यक्त करून त्या सार्वजनिक केल्यास त्याची कविता बनते,आपल्या अनुभवातून आलेली कविता ही सकस कविता असते,अशीच काहीशी धार्मिक प्रवृत्तीची कविता सौ.शीला जावळे यांच्या जिव्हाळा या काव्यसंग्रहात आलेली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी,चित्रपट गीतकार प्रकाश घोडके यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सौ.शीला संजय जावळे यांच्या जिव्हाळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच शेवगाव शहरात पार पडले,यावेळी ते बोलत होते.जेष्ठ पत्रकार तथा दै. लोकमतचे संपादक सुधीर लंके,कवयित्री शर्मिला गोसावी,आशा डांगे, हबीब भंडारे,शब्दगंधचे संस्थापक सुनिल गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,शाहीर भारत गाडेकर,कवी अर्जुन देशमुख,भगवान राऊत व संजय जावळे यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रकाश घोडके म्हणाले की,जिव्हाळा मध्ये एकूण ६९ रचनांचा समवेश असून त्यातील अनेक रचना या जीवनाचा सार सांगणा-या आहेत.यावेळी बोलतांना कवयित्री शर्मिला गोसावी म्हणाल्या की, कुटुंबात संस्कार,संस्कृती आणि शिक्षणात मुल्यशिक्षणाचे महत्व असून युवाशक्तीला मूल्य शिक्षणाचे धडे मिळणे अपेक्षित आहे.त्याअनुशंगाने ज्ञान आणि असलेली परिस्थिती याची सांगड घालत संस्कृती जपणारी मने तयार करणे आवश्यक आहे.यासाठी साहित्यिक,कलावंत आपापल्या परीने प्रयत्न करत असून यामध्ये गृहिणीही मागे नाहीत, हे सौ.शिला जावळे यांनी आपल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सावंत व स्वाती ठुबे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी केले तर शेवटी राजेंद्र फंड यांनी आभार मानले.यावेळी शब्दगंधच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ नजन,बाप्पुसाहेब भोसले,प्रा.डॉ.शंकर चव्हाण, वैभव रोडी,ज्ञानेश्वर उंडे,विजय हुसळे, सौ.संगीता दारकुंडे,विद्या भडके,शालन देशमुख,स्वाती राजेभोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Tags :
13735
10





