किर्तनकार निवृर्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणी वाढल्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पुत्रप्राप्तीसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणात संगमनेर जिल्हा न्यायालयाने खटला रद्द केल्यानंतर या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निमूर्लन समितीने यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यातच आता राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात आपील दाखल केल्याने कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकारतर्फे २२ जुलैला आपील दाखल करण्यात आले आहे. त्यावर पुढील प्रक्रिया सुरू असून सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. या प्रकरणातील सरकारतर्फे फिर्याद दिलेले संगमनेरचे वैदयकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आपील दाखल करण्यासंबंधीचा निर्णय होण्यास वेळ लागला. अखेर नवीन अधिकाऱ्यांमार्फत हे आपील दाखल झाले आहे. यातील मूळ तक्रारदार अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या रंजना गवांदे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर २ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तर आता सरकारकडूनही आपील दाखल झाले आहे. त्यामुळे इंदुरीकर यांना पुन्हा एकदा न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.